रोहित दुधे/नागपुर प्रतिनिधी
नागपुर:सध्याच्या काळात पालकांनी साध्या कारणावरून रागावणेही मुलांच्या मनाला इतके लागते की, ते टोकाचे पाऊल उचलण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशीच एक चिंताजनक घटना नागपुरातुन समोर आली असुन अभ्यासावरून आईने रागावल्यामुळे दोन अल्पवयीन सख्ख्या भावांनी घर सोडले आहे.
त्रिमुर्ती नगर येथील दत्त मंदिर परिसरात राहणारे आदित्य अमित मेश्राम (१६ वर्ष) आणि प्रथमेश अमित मेश्राम (१२ वर्ष) ही दोन मुले सोमवारी सकाळी १० वाजता प्रतापनगर येथील सोमलवार शाळेतुन सायकलवर निघाली ती अद्याप घरी परतलेली नाहीत.
त्यांच्या आई विनिता मेश्राम (३९ वर्ष) या कामावरून घरी परतल्यानंतर मुले घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. बराच शोध घेऊनही मुले न सापडल्याने त्यांनी तात्काळ राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली.
नागपुरात गेल्या दोन दिवसांत मुलांच्या बेपत्ता होण्याच्या काही अप्रिय घटना घडल्या आहेत. या पार्श्वभुमीवर रात्री उशिरापर्यंत मुलांचा शोध न लागल्याने मेश्राम कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आणि चिंतेत आहेत. पोलीस सध्या या मुलांचा शोध घेत असुन नागरिकांना काही माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही मुले अभ्यास करत नसल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना रागावले होते याच गोष्टीचा राग मनात धरून दोन्ही भावंडांनी घर सोडले असल्याचे समजते.

